पालघर : जिल्ह्यातील शालेय शिक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डहाणूतील सरवली-मोरपाडा येथे रेल्वेच्या डीएफसीसीएल प्रकल्पासाठी पाच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेची शाळा पाडण्यात आली. तेव्हापासून दोन मालवाह लोखंडी कंटेनरमध्ये या शाळेचे वर्ग भरत आहेत. शाळा तोडल्यानंतर काही महिन्यात शाळेची नविन इमारत उभारणे गरजेचे असताना आजतागायत शासन, प्रशासन आणि रेल्वेकडे शाळा बांधण्याची मागणी करूनही आश्वासनांपलिकडे काहीच हाती लागले नाही.

दिल्ली आणि मुंबई दरम्यान डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पासाठी पाच वर्षांपूर्वी या शाळेची इमारत पाडण्यात आली. त्यामुळे पहिली ते पाचवीत असलेल्या या शाळेचे वर्ग बीएमसीसीआयएल मुंबई निर्मित दोन कंटेनरमध्ये भरत आहेत. पावसाळ्यात कंटेनरमध्ये पाणी गळते, तर उन्हाळ्यात उकाड्यामुळे अंगाची काहिली होते. या कंटेनरमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही. वीजजोडणीही नसल्याने उन्हाळ्यात मुलांना त्रास सहन करावा लागतो. शाळेच्या नवीन इमारतीसाठी जागा निश्चित करण्यात आली असली, तरी बांधकामास विलंब होत आहे. त्यामुळे मुले ही शाळा सोडून इतर शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक कोमलसिंग शेरे यांनी सांगितले की, शाळेत सध्या ३२ मुले शिकत आहेत. मालवाहू डब्यांमध्ये शाळा चालवण्यास मोठी अडचण येत आहे. शाळेची इमारत लवकरात लवकर बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पावसाळ्यात येथील स्थिती खूपच वाईट असते. उन्हाळ्यात कंटेनर प्रचंड तापतो. त्यामुळे विद्यार्थी कंटेनरमध्ये बसू शकत नाहीत.

माझा मुलगा दुसरीत शिकत आहे. त्याला त्यामुळे शिक्षण व्यवस्थित मिळत नाही. मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने शाळेच्या इमारती लवकरात लवकर तयार होणे गरजेचे आहे, अशी गरज जानू गोरखाना नामक पालकाने बोलून दाखवली. तर शाळेची इमारत बांधण्यासाठी जागा मिळाली आहे. अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. शाळेच्या बांधकामासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असा दावा डहाणूच्या गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल यांनी केला आहे.